छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर येथील ऐतिहासिक बौद्ध लेणी परिसरातील गट क्रमांक 40 मध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध वृक्षतोड करून निसर्गाची थेट हत्या करण्यात आली आहे. संपूर्ण हिरवळ नष्ट करून जमिनीला सपाट करण्यात आले असून, या ठिकाणी असलेला नैसर्गिक तलावही बुजवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या परिसरात जंगली प्राण्यांचे नैसर्गिक अधिवास होते, मात्र आता त्यांच्या राहण्याची जागा पूर्णपणे नाहीशी झाली आहे.आज सकाळी या भागात काही काळवीट हरणी आल्या होत्या. मात्र त्यांना चरण्यासाठी हिरवळच उरलेली नव्हती. पाणी शोधण्यासाठी त्यांचा आसुरी प्रयत्न सुरु असतानाच, स्थानिकांनी सांगितले की भूमाफियांकडून त्या हरणांना पळवण्यासाठी गोळीबारासारखा आवाज करण्यात आला. हा आवाज मुद्दाम करुन प्राण्यांना भीती घालण्याचा प्रयत्न केला गेला, अशी शंका व्यक्त होत आहे.

या प्रकारामुळे संपूर्ण परिसरातील जैवविविधतेला मोठा धोका निर्माण झाला आहे. बौद्ध लेणीच्या इतिहासाला आणि परिसरातील निसर्ग वारशाला हे गंभीर नुकसान आहे. प्रशासन, वनविभाग आणि मनपाचे अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आता पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांनी करत आहेत. याप्रकरणी तात्काळ चौकशी करून दोषी भूमाफियांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. अन्यथा हे ऐतिहासिक ठिकाण आणि त्याचे नैसर्गिक सौंदर्य कायमचे नष्ट होईल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमधील जनतेत या प्रकारामुळे तीव्र नाराजी आहे.