गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूरमध्ये भ्रष्टाचाराविरोधात लढणारे सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे गावभर संतापाची लाट उसळली आहे. मरता मरता वाचलेल्या या कार्यकर्त्याने पोलिसांना असंख्य ठोस पुरावे सादर केले असतानाही, गुन्हेगार मोकाट फिरत आहेत. हल्ल्याच्या घटनेचा ऑडिओ आणि व्हिडिओ पुरावा पोलिसांकडे असूनही, ते आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहेत. विशेष म्हणजे, रेकॉर्डिंगमध्ये ‘रांजणगाव शेणपुंजी’ चे ग्रामविकास अधिकारी धनवई यांचे संभाषण स्पष्ट ऐकू येते, तर हल्ल्याच्या दरम्यान झालेल्या बाचाबाचीच्या व्हिडिओ क्लिपमध्ये शिवाजी पवारचा स्पष्ट सहभाग आहे. असे असताना, पोलिसांनी अजूनही कोणतीही ठोस कारवाई केली नाही, यावरून ते कुणाच्या दबावाखाली काम करत आहेत?

गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, भगवान बनकर यांनी भ्रष्टाचारविरोधी पुरावे उघड केल्यानेच त्यांच्यावर हा नियोजनबद्ध हल्ला झाला. त्यांना संपवण्याचा हा कट होता, आणि त्यांच्या हॉस्पिटल रिपोर्टवरून त्यांची गंभीर जखमी स्थितीही स्पष्ट होते. पण तरीही पोलिसांनी मुख्य आरोपींना अटक केली नाही. धनवई व शिवाजी पवार यांच्याविरोधात पुरावे असूनही, पोलिसांची निष्क्रियता हीच भ्रष्टाचाराला पाठिंबा असल्याचे स्पष्ट संकेत आहेत. मग प्रश्न हा आहे की, गुन्हेगारांना संरक्षण देण्याचे काम पोलीस करत आहेत का?
गंगापूरमधील ग्रामस्थांनी थेट पोलिसांना जाब विचारत जर लवकरात लवकर धनवई व शिवाजी पवार यांना अटक झाली नाही, तर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा दिला आहे. आता जनता पोलिसांच्या निष्क्रियतेला थेट आव्हान देण्याच्या तयारीत आहे. हा हल्ला केवळ भगवान बनकर यांच्यावर नव्हे, तर भ्रष्टाचारविरोधात लढणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यावर हल्ला आहे. गुन्हेगारांना अभय देणाऱ्या पोलिसांची झोप कधी उडणार? आणि धनवई व शिवाजी पवार यांचे रक्षण कोण करत आहे?