लासुर स्टेशन तालुका प्रतिनिधी : प्रतिनिधी : नेहमी वाहन धारकांची डोकेदुखी ठरत नसलेल्या येथील मुख्यरस्त्यावरील रेल्वे गेट ३४ वरील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी लासुर स्टेशन येथील रेल्वे मार्गा खालून भुयारीच मार्ग करण्यात यावा असा ठराव ग्रामसभेत एकमताने पारित करण्यात आला. गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी उड्डाणपूल की भुयारी मार्ग करायचा यावर मत तर्क वितर्क लावले जात होते. अनेक महिन्यापासून रखडलेला हा प्रश्न अखेर शनिवारी (दि.१) रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत निकाली निघाला आहे. आमदार प्रशांत बंब यांच्या सूचनेवरून लासुर सावंगी ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभेचे आयोजन केले होते. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच मीना संजय पांडव उपस्थित होत्या तर आमदार प्रशांत बंब, उपसरपंच संपत छाजेड यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. प्रास्तविकात आ. बंब यांनी ग्रामसभेच्या आयोजनाचे महत्व स्पष्ट केले. त्यानंतर त्यांनी ग्रामस्थांना त्यांचे प्रश्न व सूचना उपस्थित करण्याची संधी दिली.यावर सखोल चर्चा होऊन कायगाव देवगाव राज्य मार्ग ३९ वर असलेल्या रेल्वे गेट ३४ वर उड्डाणपूल (ओव्हर ब्रिज) न करता भुयारी मार्ग करणेच योग्य ठरेल असे ग्रामस्थांचे मत ठरले. या ठिकाणी भुयारी मार्ग करावा असा ठराव संतोष पांडुरंग जाधव यांनी मांडला. त्याला अशोक शिरसाट यांनी अनुमोदन दिले.

ठरावाच्या बाजूने उपस्थित ग्रामस्थांनी हात वर करून मतदान केले. ठरावाच्या विरोधात एकाही ग्रामस्थांनी हात वर केले नाही. त्यामुळे भुयारी मार्गाचा ठराव एकमताने पारित करण्यात आला. यावेळी व्यापारी सुरेश मुनोत, वैजापूर बँकेचे संचालक प्रीतम मुथा, अनिल चंडालिया, अमोल जाधव, रवींद्र चव्हाण, सौ. शीला गाढे, गणेश व्यवहारे, संदीप गायकवाड, नारायण ठोळे , सोपान बोरकर, राजू गायकवाड, प्रकाश कोकरे, भगवान गाढे, ग्राम विकास अधिकारी ज्ञानेश्वर मुकणे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.गेल्या अनेक वर्षापासून नागरिकांसाठी डोकेदुखी ठरलेला हा प्रश्न ग्रामसभेत निकाली निघाला आहे उड्डाणपूल ऐवजी भुयारी मार्गाला ग्रामस्थांनी पसंती दिली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मार्ग मोकळा झाला आहे भुयारी मार्गाचे काम सुरू व्हायला प्रत्यक्षात तीन महिन्याचा कालावधी लागणारा असून पूर्ण होण्यास एक वर्ष लागणार आहे अशी माहिती आ बंब यांनी ग्रामसभेत नागरिकांना दिली जड वाहनांसाठी कांदा मार्केट परिसरातून बायपास होणार असून त्या ठिकाणी उड्डाणपूल करण्यात येणार आहे त्यासाठी दोन वर्षाचा कालावधी लागणार आहे यादरम्यान नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो त्यासाठी संयमाची भूमिका घेण्याचे आवाहन नागरिकांना आ. बंब यांनी यावेळी केले.