गंगापूर (प्रतिनिधी): गंगापूर तालुक्यातील शेणपुंजी येथील समाजसेवक भगवान बनकर यांनी मोठ्या घोटाळ्याचा पर्दाफाश केल्याने संपूर्ण प्रशासनात खळबळ उडाली आहे. त्यांनी उघड केलेल्या माहितीमुळे जिल्हा परिषदेतील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. प्रशासनातील ही गैरव्यवस्था बाहेर पडू नये म्हणून संबंधित अधिकारी शासकीय काम बंद आंदोलनाच्या आड लपण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप आहे. या आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होत आहे. आधीच रखडलेली सरकारी कामे अधिकच विलंबित होत असून, यामुळे जनतेला नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. शासकीय काम ठप्प झाल्याने प्रशासनालाही मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनाचा हा पळवाट शोधण्याचा प्रयत्न नागरिकांच्या रोषास कारणीभूत ठरत आहे.

याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्यात आली आहे. समाजसेवक भगवान बनकर यांनी सत्य समोर आणण्याचा निर्धार व्यक्त केला असून, लवकरच या घोटाळ्यातील वास्तव समोर येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. नागरिकांनीही याबाबत सतर्क राहून आपल्या हक्कांसाठी आवाज उठवण्याची गरज असल्याचे मत तज्ज्ञांनी मांडले आहे.संविधान आणि कायद्याचा सन्मान करत प्रशासनाने या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. सत्य दडपण्याचा कोणताही प्रयत्न यशस्वी होणार नाही, तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.