छत्रपती संभाजीनगर (प्रतिनिधी) : मौजे शहानुरवाडी (सर्वे नं. 23) मधील न्याय प्रविष्ट जमिनीत बेकायदेशीरपणे इतर व्यक्तींची नावे सातबाऱ्यावर चढवून, परवानगीविना बांधकाम करण्यात आल्याचा आरोप करत पठाण ताजखाँ इनायतखाँ यांनी आज दुपारी 1 वाजता विभागीय आयुक्त महसूल कार्यालयासमोर अमरण उपोषण सुरू केले. पठाण हे दैनिक तुफान शहंशाह या वृत्तपत्राचे गेवराई प्रतिनिधी असून, त्यांनी 24 फेब्रुवारी रोजी यासंबंधी लेखी तक्रार पोस्टाने सादर केली होती. ताजखाँ पठाण यांच्या म्हणण्यानुसार, सर्वे नं. 23 मधील एकूण 21 एकर 14 गुंठे क्षेत्र हे न्यायप्रविष्ट असून, ते संरक्षित कुळाच्या अधिकारात असतानाही त्या जमिनीत तृतीय व्यक्तींची नावे गैरप्रकाराने सातबाऱ्यावर नोंदवण्यात आली आहेत. याशिवाय, संबंधित जमिनीत प्रफुल्ला अग्रवाल यांच्या नावाने बांधकाम परवाने देण्यात आले असून, हे परवाने तसेच त्यावरील सर्व बांधकामे बेकायदेशीर आहेत, असे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, या बेकायदेशीर परवानग्यांची तातडीने रद्द करून नवीन कोणतीही बांधकाम परवानगी देण्यात येऊ नये. शिवाय, सदर जमिनीत उभारण्यात आलेली सर्व अनधिकृत बांधकामे तात्काळ हटवावीत आणि नागरिकांना दिलेल्या सोयी-सुविधाही बंद करण्यात याव्यात. झोन क्र. 8 मधील वार्ड अभियंत्यांनी सादर केलेल्या गुंठेवारी प्रस्तावास महापालिकेने दिलेली मान्यता देखील रद्द करावी, अशी ठाम मागणी त्यांनी केली आहे. या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार ताजखाँ पठाण यांनी व्यक्त केला असून, त्यांच्या सोबत काही समर्थकदेखील उपोषणात सहभागी झाले आहेत. प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी आणि तातडीने योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
