गंगापूर (प्रतिनिधी) : गंगापूर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या दलित वस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. गावकुसाबाहेर राहणाऱ्या दलित व मागासवर्गीय समाजाच्या नावे कोट्यवधी रुपयांचा अपहार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. ग्रामसेवक व सुहास वाघचौरे यांच्या संयुक्त खात्यांमध्ये हे पैसे वळवण्यात आल्याचे वृत्त आहे. शिवाजी पवार यांनीही घरकुल लाभार्थ्यांची दिशाभूल करत स्वतः घरे बांधतो, असे सांगून अनेकांची फसवणूक केली. आजही अनेक लाभार्थ्यांची घरे अपूर्ण आहेत. यावर सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी आवाज उठवत ३५३ अंतर्गत गुन्हा दाखल केला, परंतु उलट त्यांच्या विरोधात खोट्या केसेस दाखल करून त्यांना हर्सूल कारागृहात डांबण्यात आले. निर्मला भालेराव यांच्या उपोषणाची दखल घेत त्रयस्थ यंत्रणेद्वारे भ्रष्टाचार उघडकीस आला असून, भगवान बनकर यांच्या विरोधात पुन्हा ३५३ अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. कोणतीही चौकशी न करता दलित कार्यकर्त्यांवरच खोटे गुन्हे लादले जात आहेत, ही बाब समाजाच्या झोपलेल्या मनोवृत्तीवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. सामाजिक कार्यकर्ते भगवान बनकर यांनी गंभीर आरोप करत सांगितले की, सुहास वाघचौरे यांनी कटकारस्थान रचून त्यांच्यावर प्राणघातक हल्ला घडवून आणला.

या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरीदेखील त्यांच्यावरच पुन्हा खोटे गुन्हे लादले जात आहेत. “दलितांनी आजही गुलामगिरीतच जगायचं का? किती दिवस भीक मागायची? किती आंदोलनं करायची?” असा सवाल भगवान बनकर यांनी उपस्थित केला आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाच्या आधारे आपल्या हक्कांसाठी लढताना जर प्राणघातक हल्ले होत असतील, तर हा सर्व समाजासाठीच धोक्याचा इशारा आहे. बनकर यांनी गंगापूर तालुक्यातील पाच सर्कलचे ग्रामसेवक भ्रष्टाचारात गुंतल्याचा आरोप केला असून, भविष्यात त्यांच्या जीवाला धोका असल्याचेही स्पष्ट केले आहे. “माझ्यावर जर काही झाले, तर सुहास वाघचौरे, धनवयी, मुळे, गादु भोंडवे, शिवाजी पवार वाघ हे जबाबदार असतील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे.